झणझणीत मिसळ हा खवय्यांचा लाडका मेनू आहे. चवदार मिसळ आणि लालजर्द तर्री सर्वांना आवडते. त्यामुळे वडापावसोबतच आता मिसळपावची लोकप्रियता वाढली आहे. मटकी-फरसाणचे जमलेले चवदार मिश्रण आणि त्याच्यावर लालजर्द तर्री...अहाहा! प्रत्येक खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटण्यासाठी मिसळपावचे एवढे वर्णन पुरेसे ठरावे. पुणे शहरातील शिवनेरी मिसळपावच्या अनेक ‘शाखा’ प्रसिद्ध आहेत.
मिसळची चव पाककृतीवर बेतलेली आहे. मोड आलेली मटकी आणि फरसाणचे गणित चुकले की मिसळीचा लगदा होण्याची भिती अधिक. त्यामुळे प्रत्येक पदार्थांत गुणवत्ता राखल्यास चांगली मिसळ तयार होते. मिसळचे उत्तम मिश्रण आणि दोन भलेमोठे पाव, कांदा, लिंबू असा जामानिमा असल्यामुळे खवय्ये ‘शिवनेरी मिसळ’च्या प्रेमात पडले आहेत.
मिसळ चवदार करण्यात प्रत्येक पदार्थाचे महत्त्व आहे. मोड आलेली मटकी, ओले खोबरे, कापलेला कांदा-टोमॅटो, चिवडा, फरसाण, बारीक शेव, लसूण, लाल तिखट, काळा मसाला आणि वर टाकण्यासाठी कोथिंबीर. या सगळ्या पदार्थांचे योग्य प्रमाण राखल्यास चवदार मिसळ तयार होते. एखाद्या पदार्थाचे कमी-अधिक प्रमाण मिसळ फसण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे योग्य प्रमाण राखूनच मिसळ तयार करतो. काहींना मिसळची चव वाढवण्यासाठी दही पाहिजे असते. पोट बिघडू नये म्हणूनही काहीजण दही मागवतात. प्रत्येकाची खाण्याची तऱ्हा निराळी असली तरी प्रत्येकाला मिसळ हवी असते.